
कल्याण: एकीकडे तापमानाचा पारा ४३ अंशांवर पोहोचून नागरिक अक्षरशः उकाड्याने हैराण झाले असताना, दुसरीकडे कल्याण पूर्वेतील द्वारली पाडा, भाल, माणेरे आणि वसार परिसरात वारंवार होणाऱ्या वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रकारामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला आहे.
सततच्या वीज खंडिततेमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणावर तसेच विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीवर याचा विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. तर शेतकरी वर्गालाही या समस्येचा फटका बसत असून दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले आहे.
या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य युवराज ज्ञानदेव कांबळे यांनी टाटा पॉवरच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
“कडक उन्हात नागरिकांना वीजेच्या लपंडावाचा सामना करावा लागत असून प्रशासनाने तातडीने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा. अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा युवराज कांबळे यांनी दिला आहे.
दरम्यान, वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून टाटा पॉवर प्रशासन यावर कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.