
कल्याण (प्रतिनिधी):कल्याण शहरात निर्माण झालेल्या एलपीजी गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या अडचणी गंभीर बनल्या असून याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सचिव वल्ली राजन यांनी तहसीलदार कार्यालय, कल्याण येथे निवेदनाद्वारे केली आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडरच्या कमतरतेमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. अनेक ग्राहकांनी बुकिंग करूनही वेळेत सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. काही ठिकाणी काळाबाजार, जादा पैसे आकारणी आणि जाणीवपूर्वक विलंब केल्याच्या घटनाही समोर येत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर सर्व गॅस एजन्सींनी सामाजिक जबाबदारी पार पाडत ग्राहकांना योग्य सेवा द्यावी, असे आवाहन वल्ली राजन यांनी केले. बुकिंगनुसार वेळेत गॅस वितरण करणे, शासनाने निश्चित केलेल्या दरांनुसारच होम डिलिव्हरी करणे आणि कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार टाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच प्रशासनाकडे खालील मागण्या करण्यात आल्या आहेत:
१)बुकिंगनंतर निश्चित कालावधीत गॅस सिलेंडरचा पुरवठा करावा.
२)होम डिलिव्हरीसाठी ठरवलेल्या दरापेक्षा जास्त पैसे घेऊ नयेत
३)कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी
४)सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्याने गॅस उपलब्ध करून द्यावा
या सूचनांचे पालन न झाल्यास संबंधित गॅस एजन्सींविरोधात तक्रार करून कठोर कारवाईची मागणी करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
सद्यस्थितीची गंभीरता लक्षात घेता प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी ठाम मागणी वल्ली राजन यांनी व्यक्त केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामध्ये कल्याण जिल्हाध्यक्ष दिनेश परदेशी, अल्पसंख्याक विभागाचे प्रभारी अध्यक्ष रमजान भाई अन्सारी, सरचिटणीस संतोष सरस्वती बळीराम पाटील, असंघटित कामगार विभाग जिल्हाध्यक्ष गोरख भिवा शिंदे तसेच समाजसेवक तोषेश शुक्ला यांचा समावेश होता.