
दि.५(डोंबिवली) : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ ३ कल्याण अंतर्गत डोंबिवली विभागात “विद्यार्थी सुरक्षा व उपाय योजना मार्गदर्शन शिबिर” हा उपक्रम गुरुवारी (५ मार्च) जिमखाना हॉल, जिमखाना रोड, डोंबिवली पूर्व येथे पार पडला. “सुरक्षित विद्यार्थी, सुरक्षित शाळा, सुरक्षित प्रवास” या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाला शाळांचे शिक्षक, बस चालक-मालक संघटना तसेच पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व संबंधित घटकांनी एकत्रितपणे जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. बस चालक-मालक संघटना, शिक्षक आणि चालकांच्या समस्या व अडचणी ऐकून घेत त्यांनी त्यावर विविध उपाययोजना सुचवल्या.
यावेळी विद्यानिकेतन शाळेचे पंडित सर यांनीही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करताना डोंबिवलीतील वाढत्या वाहतूक कोंडीबाबत नाराजी व्यक्त केली व त्यावर उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित केली.

कल्याण ट्रॅफिक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त किरण बालवाडकर यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेमध्ये पोलीसांसोबतच पालक, विद्यार्थी आणि शाळांचीही महत्त्वाची जबाबदारी असल्याची जाणीव करून दिली.
या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक परिवहन विभागअमित नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड (डोंबिवली पोलीस स्टेशन), वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे (मानपाडा पोलीस स्टेशन), वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम (टिळकनगर पोलीस स्टेशन), वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे ( विष्णू नगर पोलीस स्टेशन),गटविकास अधिकारी सुनीता मोटघरे मॅडम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात जनजागृती करणे आणि सुरक्षित प्रवासाबाबत मार्गदर्शन देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश असून कार्यक्रम उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडला.