
दि. ४ कल्याण :कोळसेवाडी पोलीस ठाणेच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही तासांत कारवाई करत ५ लाखांची लूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून ८ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत २.३६ लाखांची रोकड, दोन स्कॉर्पिओ गाड्या आणि ९ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
तक्रारदार दीपक शिंदे (रा. वाघोली, पुणे) यांना आरोपींनी ५ लाखांच्या बदल्यात ७ लाख रुपये (१०, ५० व १०० च्या नोटांमध्ये) देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार त्यांना कल्याण पूर्व येथील विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक परिसरात बोलावण्यात आले.
तक्रारदार ५ लाखांची रोकड घेऊन ठरलेल्या ठिकाणी पोहोचताच, स्कॉर्पिओमधून आलेल्या तीन-चार जणांनी स्वतःला पोलीस असल्याचे भासवले. पैसे बदलणाऱ्या इसमाला गाडीत बसवून तक्रारदार यांच्या हातातील ५ लाखांची बॅग हिसकावून आरोपी स्कॉर्पिओने फरार झाले.
या घटनेप्रकरणी दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हा रजि. क्र. १०३/२०२६ भा.न्या.स. कलम ३१० (२), ३०९ (४)(६), २०४, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हे शोध पथकाने मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपींची स्कॉर्पिओ जुना पुणे महामार्गाने जात असल्याची माहिती मिळवली. तत्काळ तळेगाव दाभाडे पोलीसांच्या मदतीने सोमाटणे टोलनाक्यावर (MH-04-GD-7823) स्कॉर्पिओसह चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
यानंतर आळंदीमार्गे अहिल्यानगर-शिर्डी रोडकडे पळालेल्या उर्वरित आरोपींना राहुरी पोलीसांच्या मदतीने नाकाबंदी करून अटक करण्यात आली. आणखी एक आरोपी पुढील ३६ तासांत जेरबंद करण्यात आला.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पुढीलप्रमाणे:
चोरीतील रोख रक्कम – ₹२,३६,०००
दोन स्कॉर्पिओ गाड्या
९ मोबाईल फोन
इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही कारवाई अतुल झेंडे (पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ कल्याण), कल्याणजी घेटे (सहाय्यक पोलीस आयुक्त) तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव व पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या .
मार्गदर्शनाप्रमाणे कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे सपोनि. संदिप भालेराव, पोउनि. जगन सापटे, पोहवा./२१५जाधव, पोहवा /१२२६ सांगळे, पोहवा/५०३वाध, पोहवा /२४८६ मुसळे, पोहवा /६५९६ जरग, पोहवा/३११२ सौंदाणे, पोहवा /६९३०घुगे, पोहवा. /२२८३आव्हाड, पोहवा /१५३२बोरसे, पोहवा/६५४८ सांगळे, पोहवा/६२५६ कापडी, पोना/४५७कोती, पोना/५०२५फटांगरे, पोशि./८४१४गिते, पोशि/१५२६ इंगळे, यांनी केली आहे.
कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने समन्वय साधत अवघ्या पाच तासांत आरोपींना ताब्यात घेऊन उल्लेखनीय कामगिरी बजावली.