
दि.१ (कल्याण ): कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यालयासमोरील शंकरराव चौक येथील वाहतूक बेटावर प्रस्तावित मोबाईल टॉवर उभारणीच्या निर्णयाविरोधात स्थानिक नागरिकांनी तीव्र हरकती नोंदवल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते वल्ली एस. राजन यांनी याबाबत आयुक्त अभिजीत गोयल यांना निवेदन सादर करून निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, मोबाईल टॉवर उभारणीसाठी महापालिकेची अधिकृत मंजुरी, राज्य शासनाची परवानगी तसेच Department of Telecommunications आणि Telecom Regulatory Authority of India यांच्या नियमांचे पालन अनिवार्य आहे. याशिवाय EMF Radiation Norms, सार्वजनिक सुरक्षितता, अर्बन प्लॅनिंग आणि रोड सेफ्टीच्या निकषांचे काटेकोर पालन झाले आहे का, याबाबत नागरिकांनी शंका व्यक्त केली आहे.
सदर ठिकाणाच्या परिसरात शाळा, निवासी वस्ती तसेच ज्येष्ठ नागरिकांची लक्षणीय संख्या असल्याने मोबाईल टॉवरमधून निर्माण होणाऱ्या विद्युतचुंबकीय किरणोत्सर्गाच्या (EMF) संभाव्य परिणामांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. विविध अभ्यासांचा दाखला देत डोकेदुखी, झोपेचे विकार, थकवा, चक्कर येणे, स्मरणशक्तीवर परिणाम तसेच हृदयविकाराशी संबंधित तक्रारी उद्भवू शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांवर त्याचा अधिक परिणाम होऊ शकतो, असे निवेदनात नमूद आहे.
महानगरपालिका ही नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेची जबाबदार संस्था असल्याने संबंधित परवानगी सर्व नियम व निकष पूर्ण करूनच देण्यात आली आहे का, याची सखोल चौकशी करावी. आवश्यक असल्यास संबंधित कंपनीस दिलेली परवानगी रद्द करून पर्यायी व सुरक्षित ठिकाण निश्चित करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन आरोग्य व सुरक्षिततेला प्राधान्य देत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.